मुंबई, 14 नोव्हेंबर : 'शिवसेनेने अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार न करता भाजप या आपल्या जुन्या मित्रासोबत एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावं. भाजपनेही दोन पाऊले मागे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत तडजोड करून सत्ता स्थापन करावी. 30 वर्षे जुन्या युती च्या भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यात दिलजमाई करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,' असा इरादा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बोलून दाखवला आहे.

'मी मुंबई आल्यानंतर भाजपचे विधिमंडळाचे नेते  देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणे फार चांगले नाही,' असं रामदास आठवले यांनी दुबई येथून पाठविलेल्या संदेशात व्यक्त केले आहे. सध्या ते दुबई दौऱ्यावर आहेत.

'शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत योग्य दिशेने चर्चा चालू आहे असे म्हटले असले तरी त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत युती करण्याची दिशा चुकीची आहे. त्यांनी राज्यात सत्ता  स्थापन करण्यासाठी चर्चा करण्याची योग्य दिशा भाजप आहे. कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे भाजप शिवसेने मध्ये दिलजमाई करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,' असं आठवले म्हणाले.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-सेनेत बिनसल्यानंतर राज्यात अभुतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपपासून फारकत घेतलेल्या शिवसेनेनं काँग्रेस-राषट्रवादीच्या मदतीनं सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. सत्तेचं सोपान गाठण्यासाठी विरोधी विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येण्याच्या दिशेनं आता वाटचाल सुरू केली आहे.