Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपा सरकार आज स्थापनेचा दावा करणार नाही




मुंबई /दिल्ली :- अल्पमतातलं सरकार बनवण्याचे इशारे देत देत भाजपाने आज पुन्हा वेट ऍण्ड वॉचची भूमिका घेणं पसंत केलं असून भाजपा आज सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मात्र चंद्रकांतदादा आणि मुनगंटीवार दुपारी राज्यपालांची भेट घेणार आहेत. पत्रकार परिषदेत युतीचच आणि स्थिर सरकार राज्यात येईल, असा विश्‍वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला आलेल्या बच्चू कडू यांनी ‘शेतकर्‍यांना मदत पोहचली नाही तर राज्यपालांच्या दारात आंदोलन करू,’ असा इशारा दिला आहे तर तिकडे दिल्लीत देवेंद्र यांच्या नेतृत्वाखालीच सरकार बनले पाहिजे, असे म्हणत, ‘मी दिल्लीत आहे, महाराष्ट्रात येण्याचा प्रश्‍नच नाही’, असा खुलासा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केला. आजही सत्ता स्थापनेचा तिढा ‘जैसे थे’ असून शिवसेनेचे संजय राऊत यांनी पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनणार असल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिम्मत कोणात नाही, सर्व आमदार एकनिष्ठ असल्याचे म्हटले आहे. 

देवेंद्र यांच्या नेतृत्वातच सरकार
बनलं पाहिजे -गडकरी
महाराष्ट्राच्या हिताचा लवकरच निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार बनलं पाहिजे, असे म्हणत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजप-सेना युती दरम्यान ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे आजपर्यंत ठरलेले आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचा सहभाग मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करत मी दिल्लीत आहे, महाराष्ट्रात येण्याचा प्रश्‍नच नाही असेही गडकरी यांनी म्हटले.
भाजपा आमदार फोडण्याच्या तयारीत -जयंत पाटील
फोडाफोडीचं राजकारण करणार्‍या भाजपाकडून काही आमदारांना आमिषे दाखवण्यात येत असून भाजपा आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगत आमच्याकडे जे फुटणारे होते ते आधीच गेले, आता राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नसल्याचे जयंत पाटलांनी सांगून भाजपावर गंभीर आरोप केले.
मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरू
राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसताना आणि शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसलेली असताना आज शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत सरकार स्थापनेसह भाजपा आमदार फोडत असल्याच्या बातम्या येत असल्याने यावर चर्चा करण्यासाठीही सदरची बैठक असावी. या बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. 

...तर राज्यपालांच्या दारात
आंदोलन -बच्चू कडू
मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीसाठी आलेल्या आ. बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार स्थापन करायचं तेव्हा करा, आधी शेतकर्‍यांना मदत पोहचती करा, असे म्हणत शेतकर्‍यांना मदत पोहचली नाही तर राज्यपालांच्या दारात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. राज्याच्या सद्यस्थितीवर राज्यपालांनी पुढाकार घ्यावा, असंही कडू म्हणाले.
शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार -सुधीर मुनगंटीवार
शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. शिवसेना आमचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करत असून यासंबंधी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस शिवसैनिक आहेत असं उद्दव ठाकरेंनी म्हटलं होतं, त्यामुळे शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असं म्हटलं. युती व्हावी हीच आमची इच्छा असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
भाजपाने सरकार स्थापण्याची सारी तयारी केली आहे. शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर २०१४ प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. शिवसेना आता सरकारमध्ये सहभागी झाली नाही तरी पुढील १५ दिवसांनंतर सरकारमध्ये सहभागी होईल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. पुढील दोन-तीन दिवसांत सरकार स्थापण्याची योजना असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात अल्पमतातील सरकार बसवण्याची कोणतीही योजना नसून शिवसेना-भाजपाचं स्थिर सरकार देणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबत आज सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.






आपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर
वेबसाइट वर जउन Submit बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा
Ilovebeed2019@gmail.com वर