मुंबई: 'बाबा सकाळी आजोबांना भेटले. त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यांच्यात नेमकं काय ठरलं, हे मलाही माहीत नाही. ते त्या दोघांनाच माहीत आहे,' अशी प्रतिक्रिया अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली. भाजपसोबत हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे यांचे बंड काल अखेर थंडावले. हे बंड शमवण्यात नेमका कोणाचा हात होता आणि राष्ट्रवादीमध्ये परतण्यासाठी अजित पवारांना नेमकं काय आश्वासन दिलं गेलं, याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. याबाबत पार्थ पवारांना विचारलं असता त्यांनी आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सांगितलं. 'अजित पवार आणि साहेब सकाळी भेटले आणि त्यांच्यात चर्चा झाली, इतकंच मला माहीत आहे,' असं त्यांनी सांगितलं.
'आता सगळं काही ठीक झालंय. आमचा पक्ष शिवसेना व काँग्रेससोबत सरकार स्थापन करतो आहे. ठरल्याप्रमाणं झालं आहे. बाबा पुन्हा पक्षात आलेत,' असं पार्थ यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार येईल, असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते असलेल्या अजित पवार यांनी अचानक बंड करून भाजपचा तंबू गाठला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणायचेच असा निर्धार केलेल्या पवारांनी अजित पवार यांचे बंड शमवण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवर काम सुरू केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सतत अजितदादांशी चर्चा करायला लावली. दुसरीकडं, कुटुंबातील काही महत्त्वाच्या व्यक्तींकडून त्यांची मनधरणी सुरू केली. पार्थ पवारही या सगळ्यामध्ये असल्याचं बोललं जात होतं. निवडणुकीपूर्वी देखील अजित पवार यांनी असाच तडकाफडकी निर्णय घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी शरद पवार हे स्वत: पार्थशी बोललो होते. यावेळीही तसंच झालं असावं, असं बोललं जात होतं. मात्र, पार्थ यांनी आपल्याकडे फार काही माहिती नसल्याचं स्पष्ट केलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XOAXnf
via IFTTT