बीड:- बीड विधानसभा मतदार संघातील शेतकर्यांच्या शेतात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने व्हायला हवे आहे. त्यात पुर्वी झाले तसे राजकारण होऊ नये अशा सुचना आ.संदीप क्षीरसागर यांनी आज अधिकारी कर्मचार्यांना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन टिळेकर, दिलीप जाधव, मा.आ.सय्यद सलीम, सुनील धांडे, सिराज देशमुख उपस्थित होते.
आ.संदीप क्षीरसागर यांनी आज बीड शिरुर तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यासह अधिकार्यांसोबत बैठक घेतली. यावेळी बोलतांना संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने शेतकर्यांची पिके उध्दवस्त केली आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने व्हायला हवे. पंचनामे करतांना या आधी जसे राजकारण झाले तसे राजकारण आता कोणीही करु नये. सरसकट पंचनामे करुन प्रत्येक शेतकर्याला शासनाची मदत मिळाली पाहीजे. पिकांसोबतच शेतकर्यांची घरे, विहीर, जनावरे याचेही पंचनामे व्हायला हवेत. पंचनामे करतांना शेतकर्यांचे नुकसान प्रामुख्याने लक्षात घ्यावे. आज शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्याला शासन प्रशासन व्यवस्थेने मदत करायला हवी. अशा सुचना देतांना यामध्ये राजकारण होणार नाही अशी अपेक्षा संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन टिळेकर यांनी प्रशासन शेतकर्यांसोबत असून कोणाचेही नुकसान होणार नाही असा शब्द दिला.

