कराड: 'आयुष्यात संकटं येत असतात आणि त्यातून मार्गही निघतो. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा जोपर्यंत मला पाठिंबा आहे, तोपर्यंत मला चिंता नाही,' अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींबाबत बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शरद पवार आज कराडमध्ये आहेत. आज सकाळीच त्यांनी 'प्रिती संगम' येथे यशवंतरावांना आदरांजली वाहिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. अजित पवार यांच्या बंडामागे तुमचा हात आहे का असा प्रश्न विचारला असता शरद पवार हसले. ते म्हणाले, 'गेल्या ५० ते ५२ वर्षांते अशा प्रकारचे प्रसंग अनेकदा आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता अशा प्रसंगी नेहमीच योग्य बाजूनं उभे राहतात असा माझा अनुभव आहे. लोकांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत चिंता नाही.' अजित पवारांच्या बंडामागे हात असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. 'या सगळ्याला माझी संमती असती तर मी माझ्या सहकाऱ्यांना त्याची कल्पना दिली असती. मी एखादी भूमिका मांडली आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्याचा अनादर केला आहे असं झालेलं नाही. मात्र, पक्ष म्हणून आमचा अजित पवारांच्या निर्णयाशी अजिबात संबंध नाही,' असं पवार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजच पदभार स्वीकरणार असल्याबद्दल शरद पवार यांना विचारलं असता त्यात काही वावगं नसल्याचं त्यांनी सांगितलं. 'शपथ घेतल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारू शकतात. मुद्दा त्यांची निवड कायदेशीर आहे की नाही हा आहे,' असं ते म्हणाले. भाजपनं वेगळेपण दाखवून दिलं! 'बहुमत नसतानाही भाजपनं सरकार बनवलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. केंद्रातील सत्तेचा गैरवापर आणि राजभवनांच्या संकेतांना हरताळ फासून भाजपनं आपल्या पक्षाचं वेगळेपण दाखवून दिलं आहे,' असा टोला त्यांनी यावेळी हाणला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37wBFtE
via IFTTT