मुंबई : भाजपने बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केल्याची माहिती आहे. भाजपने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवूनच कमळ फुलवलं होतं, त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातही ही तयारी सुरू झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. याची जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेले नेते गणेश नाईक, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर सोपवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. कर्नाटकात काय झालं होतं ? भाजपने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवलं आणि मोठ्या घडामोडींनंतर सत्ता स्थापन केली. कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण काँग्रेस आणि जेडीएसने सरकार स्थापन केलं. नाराज असलेल्या १७ आमदारांना भाजपने हाताशी धरलं आणि सूत्र हलवली. कर्नाटकच्या या बंडखोर आमदारांना मुंबईतील रेनिसन्स (जिथे सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत) हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आणि काँग्रेस-जेडीएस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास भाग पाडलं. १७ आमदार गैरहजर असल्यामुळे बहुमताचा आकडा खाली आला आणि भाजपने सहज सत्ता मिळवली. काय आहे महाराष्ट्रातील ‘ ऑपरेशन लोटस ’? भाजपला बहुमत सिद्ध करायचं असेल तर इतर पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळेच भाजपात इतर पक्षातून आलेले जे दिग्गज नेते आहेत, ते कामाला लागले असल्याचं सांगितलं जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. याशिवाय नारायण राणे यांचाही अनुभव कमी नाही. गणेश नाईक हे राष्ट्रवादीत पवारांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे याच नेत्यांवर आता आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपच्या रणनीतीची उत्सुकता येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकण्यासाठी भाजपच्या बैठकीत रणनीती आखण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शेलार यांनी ही माहिती दिली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. आमदारांनीच हा ठराव मांडल्याचं शेलार यांनी सांगितलं. राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थिर आणि सक्षम सरकार देण्यात येईल. राज्याच्या विकासाला गती देण्यात येणार असल्यांचही ते म्हणाले. ‘ भाजप आमदारांना कुठेही हलवणार नाही ’ ‘भाजपच्या आमदारांना कुठेही हलवण्यात येणार नाही, कुठेही डांबून ठेवण्यात येणार नाही. आमदारांचा आमच्या नेत्यांवर विश्वास आहे. त्यांची पक्षावर निष्ठा आहे. त्यामुळे त्यांना कुठेही हलवण्याची गरज नाही’, असं शेलार म्हणाले. आमदारांवर विश्वास ठेवू न शकणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीलाच आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आली हे दुर्दैवं असल्याची टीका शेलार यांनी केली. राज्यात नव्हे, तर ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार सुरू असल्याचंही ते म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2qHDRxJ
via IFTTT