मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केल्यानंतर काही वेळातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला आहे. या वेगवान घडामोडींनंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीची सायंकाळी साडेसहा वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार असून यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर अवघ्या ७९ तासांतच सत्ताचक्र फिरले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार तोंडघशी पडले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाने आज सकाळी ऐतिहासिक निर्णय दिला. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करून बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पाडावा व त्यानंतर लगेचच विश्वासदर्शक ठराव घेण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यानंतर बहुमताचा दावा करणाऱ्या फडणवीस आणि अजितदादांची पंचाईत झाली. राष्ट्रवादीतून एकाकी पडलेल्या अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनीही बहुमत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानुसार फडणवीस यांनी नुकताच आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला असून या घडामोडीनंतर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीचे तीनही गटनेते व अन्य प्रमुख नेते थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असे सांगण्यात येत आहे. हा दावा करण्यात आल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित करण्यात येणार आहे. अर्थात हे नाव उद्धव ठाकरेच असेल हे आधीच स्पष्ट झालेले आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार हेच उद्धव यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्यपालांकडून सत्तास्थापनेचं आमंत्रण मिळाल्यानंतर उद्याच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार असे सांगितले जात आहे. उद्धव यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील व काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2skItdR
via IFTTT