Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय; पवारांचा गर्भित इशारा


मुंबई: 'फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. ३० नोव्हेंबरला पुढचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील,' असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज केलं. पवारांच्या या वक्तव्यामुळं राज्यात येत्या काही दिवसांत बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपच्या या राजकारणामुळं धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. 'अजित पवार हे आज सकाळी सकाळी राजभवनात गेले आहेत, असं मला सहा वाजता कळलं. महाराष्ट्राच्या राजभवनाची कार्यक्षमता अचानक इतकी वाढल्याबद्दल मला आनंद झाला. मात्र, नंतर सगळ्या घडामोडींचा उलगडा झाला. असं काही करतील हे मलाही वाटलं नव्हतं. भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या धोरणाविरोधात आहे. हा एक प्रकारचा शिस्तभंग आहे. राष्ट्रवादीचा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाण्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्राचं जनमानस भाजपच्या विरोधात आहे. याची दखल न घेता कुणी निर्णय घेत असेल तर सर्वसामान्य जनता त्यांना पाठिंबा देणार नाही,' असं पवार म्हणाले. अजित पवार यांच्यावरील कारवाईबद्दल विचारलं असता पवार म्हणाले,
'त्याबाबत निश्चितच निर्णय घेतला जाईल. कारवाईचा निर्णय कुणी एक व्यक्ती घेऊ शकत नाही. पक्षाच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होईल.' सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रिपदाचा मुद्दाच नव्हता! सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाचं नाव चर्चेत आल्यानं अजित पवार नाराज असल्याची चर्चा शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. 'सुप्रियाच्या मुख्यमंत्रिपदाचा काही प्रश्नच नव्हता. सुप्रिया या सध्या लोकसभेत खासदार आहेत. त्यामुळं ती चर्चा चुकीची आहे,' असं पवार म्हणाले. 'त्या' आमदारांना मिळून पाडणार! राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा पक्षात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांची यादी पक्षाच्या कार्यालयात होती. ही यादी ताब्यात घेऊन ५४ आमदार आमच्यासोबत असल्याचं राज्यपालांना दाखवण्यात आली असावी. राज्यपालांची फसवणूक झाली असू शकते, असंही पवार यावेळी म्हणाले. 'मी अशा फाटाफुटीच्या राजकारणातून अनेकदा गेलो आहे. माझ्या विरोधात गेलेल्या आमदारांचा अनेकदा पराभव झाला आहे. आता भाजपसोबत गेलेल्या आमदारांचं सदस्यत्व रद्द झालं आणि पुन्हा निवडणूक झाल्यास त्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून त्या उमेदवाराचा पराभव करू,' असा इशाराही त्यांनी दिला.

https://www.ilovebeed.in/ ILOVEBEED.IN BEED NEWS