Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पवारांनी बोलावलेल्या बैठकीला १२ आमदार गैरहजर

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडत असल्याचं चित्र आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ४२ आमदारांनीच उपस्थिती लावली. या बैठकीकडे १२ आमदार फिरकले नाहीत. पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्यासोबत १० ते ११ आमदार असल्याचं पवार म्हणाले होते. त्यानुसार हे आमदार अजित पवारांसोबतच आहेत का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सहीचं पत्र राज्यपालांना दिलं आणि भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. पण त्यांना खरंच आमदारांचा पाठिंबा आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अजित पवारांची गटनेतापदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर बोलावलेल्या बैठकीला बहुतांश आमदार उपस्थित राहिले. दरम्यान, राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडेही संपर्कात नव्हते. पण ते अचानक बैठकीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झाले. अजित पवारांच्या शपथविधीसाठी राजभवनला १५ आमदारांची उपस्थिती होती. त्यापैकी काही आमदारांनी नंतर शरद पवारांची भेटही घेतली आणि घटनाक्रम सांगितला. आपल्याला अंधारात ठेवून राजभवनला नेलं असल्याचं या आमदारांनी सांगितलं. ... तर भाजपसोबत चला : अजित पवार अजित पवार सध्या त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवारांनीच शरद पवार यांच्यासाठी एक निरोप पाठवला आहे. राष्ट्रवादीत फूट पडू द्यायची नसेल, तर भाजपसोबत चला, असा संदेश अजित पवारांनी आमदारामार्फत पाठवल्याची माहिती आहे. सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. बहुमतासाठी आवश्यक किमान १४५ आमदारांचे पाठबळ असताना आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असताना राज्यपालांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणे आणि शपथग्रहण सोहळा आयोजित करणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे, असे नमूद करतानाच या सरकारला तात्काळ विशेष विधिमंडळ अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती तिन्ही पक्षांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाला केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35xl3zZ
via IFTTT