मुंबई: राज्यातील सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख हे उद्याच मुख्यमंत्रिपदाची, काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील हे दोघेही उपमुख्यमंत्रिदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज सायंकाळी सहा वाजता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार असून त्यात ही घोषणा करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तास्थापन्याबाबतची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आघाडीच्या तंबूत खळबळ उडाली होती. आता देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही आपआपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ न घालता आजच राज्यपालांना भेटून उद्या सकाळी शपथ घेण्याचं आघाडीमध्ये घटत असल्याचं सांगण्यात येतं. आघाडीने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली असून उद्धव यांनीही मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून पुन्हा अजित पवारांचा विचार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत असून या पदासाठी जितेंद्र आव्हाड यांचं नावही चर्चेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना संसदीय कामकाजाचा अनुभव नसल्याने अनुभवी नेते म्हणून जयंत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद द्यावे, अशी राष्ट्रवादीत चर्चा आहे. भाजपकडे १०५ आमदार आहेत. त्यातील अनेक आमदार अनेक वर्षांपासून विधानसभेचे सदस्य आहेत. त्यापैकी अनेकजण फर्डे वक्ते आणि अभ्यासू आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील विरोधकांचा यशस्वी सामना करू शकतील, असा राष्ट्रवादीच्या एका गटाचा सूर आहे. उद्धव ठाकरे पाच वर्ष मुख्यमंत्री दरम्यान, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. अजितदादा आमच्यासोबतच अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते आमच्या सोबतच आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्कही झाला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.