एअरटेलने केली मोठी घोषणा :नुकतेच सर्व कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये बदल केले होते. तसंच रिलायन्स जिओने आपले टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची घोषणा केल्यानंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये 40 ते 45 टक्क्यांपर्यंतची वाढ केली होती. अशातच सर्व कंपन्यांनी केवळ आपल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याचा निर्णय घेतला होता.
तसंच अन्य मोबाईल नेटवर्कसाठी फेअर युसेज पॉलिसी लागू करण्यात आली होती. परंतु आता एअरटेलनं ग्राहकांची वाढती नाराजी लक्षात घेता फेअर युसेज पॉलिसी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पुन्हा एकदा सर्वच मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याची घोषणा केली आहे.
तर एअरटेलनं आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. आम्ही तुमचं म्हणणं ऐकलं आणि आम्ही एक बदल करत आहोत. उद्यापासून भारतात कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉल करता येतील. यासाठी कोणतीही अट नाही, अशा आशयाचं ट्विट कंपनीनं केलं आहे.
तसेच एअरटेलनं रिलायन्स जिओप्रमाणेच ठराविक कॉलची मर्यादा ओलांडल्यानंतर आययूसी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता कंपनीनं हा हे शुल्क न आकारण्याचा तसंच अमर्याद कॉल देण्याचा निर्णय घेतला आहे.
एअरटेलनं आपल्या प्लॅनमध्ये फेअर युसेज पॉलिसी लागू केल्यानंतर कंपनीच्या अनेक ग्राहकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच अनेक नेटकऱ्यांनी कंपनीच्या या निर्णयाचा विरोध केला होता. परंतु आता एअरटेलनं आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात भारताची 41 पदकांची कमाई :
दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या पाचव्या दिवशी भारताने एकूण 41 पदकांची कमाई करीत अग्रस्थान कायम राखतानाच यजमान नेपाळपासूनचे अंतरही वाढवले आहे.
भारताने 19 सुवर्ण, 18 रौप्य आणि चार कांस्यपदकांची भर घातली. आता भारताच्या खात्यावर 81 सुवर्ण, 59 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 165 पदके जमा आहेत.
तर दुसऱ्या स्थानावरील नेपाळच्या खात्यावर 116 पदके (41 सुवर्ण, 27 रौप्य, 48 कांस्य) जमा आहेत. शुक्रवारी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णपदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले.
साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान :
यंदा 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे 10 ते 12 जानेवारी दरम्यान होत आहे.
तर दर वर्षी संमेलनामध्ये एक प्रकाशक आणि एका साहित्यिकाचा विशेष सन्मान केला जातो. साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान केला जाणार आहे.
तसेच शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना संमेलनात गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचाही सन्मान होणार आहे.
साहित्य संमेलनात महिला साहित्यिकांना अध्यक्षपद भुषवण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून एक साहित्यिक आणि एक प्रकाशक यांचा संमेलनात विशेष सन्मान केला जातो.
दिनविशेष:
7 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय लष्कर ध्वज दिन‘ तसेच ‘आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन‘ आहे.
सन 1825 मध्ये बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज होते.
पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात सन 1856 मध्ये झाला.
स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म 7 डिसेंबर 1921 मध्ये झाला.
कलची घडामोडी : (6 डिसेंबर 2019)
