मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल यांनी आज त्यांच्या अभिभाषणातून दिली. आज विधानभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण झालं. राज्यपालांनी त्यांचं संपूर्ण भाषण मराठीत केलं. यावेळी त्यांनी नव्या सरकारचे आणि निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन करत नव्या सरकारचे भविष्यातील संकल्प मांडले. अवघ्या २० मिनिटाच्या या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर आमचं सरकार काम करेल, असं सांगतानाच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच नव्हे तर चिंतामुक्त करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. मराठवाडा आणि विदर्भात शाश्वत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मांडू राज्यातील आर्थिक स्थिताचा आढावा घेण्यात येणार आहे. हा आढाव घेऊन त्याचा अहवाल मांडण्यात येणार असल्याचंही राज्यपालांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं. भूमिपुत्रांसाठी नोकरीत आरक्षण राज्यात रोजगार निर्मिती ही सध्याची चिंतेची बाब आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून शासनातील रिक्तपदे भरण्यात येईल. भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यात येईल, असं ते म्हणाले. १० रुपयांत जेवण राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचं राज्यपालांनी स्पष्ट केलं. शिवसेनेने निवडणूक काळात दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली होती. त्याचं प्रतिबिंब राज्यपालांच्या भाषणात उमटलं आहे. अभिभाषणातील ठळक मुद्दे >> राज्यातील गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार >> मुंबई आणि नवी मुंबईत मराठी भाषा केंद्र उभारणार >> कर्नाटकाच्या सीमाभागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार >> आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना उच्च शिक्षण मोफत देण्याचा प्रयत्न करू >> नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधून देऊ >> प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात प्रभावीपणे सुधारणा करणार >> महिला बचत गटांना आर्थिकृष्ट्या सक्षम करणार >> सायबर गुन्हेगारी रोखणार, त्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देणार >> अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त, धनगर आणि इतर वंचित घटकांना अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचा प्रयत्न करणार >> साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि ग. दि. माडगुळकरांची जन्मोत्सव साजरा करणार
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35Nt7Np
via IFTTT