Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अजूनही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण!

मुंबई: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार विराजमान होऊन आठवडा झाला तरी अद्याप नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होऊ शकलेले नाही. यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच हेच कारण असल्याची माहिती एका मंत्र्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर दिली असून दोन्ही पक्ष महत्त्वाच्या खात्यांवर अडून बसल्याने कोंडी निर्माण झाली आहे, असे हा मंत्री म्हणाला. शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत तर शिवसेनेकडून गटनेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, शपथविधीला आठ दिवस झाले तरी हे सर्व मंत्री आजही बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळेच खातेवाटप नेमकं का रखडलंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत एका मंत्र्याने महत्त्वाची माहिती दिली. लवकरात लवकर खातेवाटप व्हावं ही आमची अपेक्षा आहे. मात्र, काही महत्त्वाच्या खात्यांवरून रस्सीखेच सुरू असल्याने खातेवाटपास उशीर होत आहे. आधीच सत्तासंघर्षामुळे राज्यात सुमारे एक महिना सरकार अस्तित्वात नसल्याने प्रशासनावर परिणाम झाला असताना खातेवाटप आणखी रखडू नये अशी आमची अपेक्षा असल्याचे मत या मंत्र्याने बोलून दाखवले. शिवसेनेकडून कोणत्याही एका खात्यासाठी आग्रह धरण्यात आलेला नाही. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून मात्र अर्थ, महसूल, गृह आणि गृहनिर्माण या खात्यांसाठी आग्रह धरण्यात आला आहे, असे या मंत्र्याने पुढे नमूद केले. दोन्ही पक्षांकडून महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह लक्षात घेता हा घोळ संपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना यात तातडीने लक्ष घालावे लागणार आहे, अशी अपेक्षाही या मंत्र्याने व्यक्त केली. नागपूर येथे १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ते पाहता अधिवेशनाआधी काहीही करून खातेवाटप उरकावे लागणार आहे, असेही हा मंत्री म्हणाला. मंत्रिमंडळाचा विस्तार घाईघाईत होणार नाही. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरच त्याबाबत निर्णय होईल. यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे एकमत असल्याचंही हा मंत्री म्हणाला. तिन्ही पक्षांच्या आमदारांत कोणत्याही प्रकारची नाराजी उद्भवू नये, म्हणून हे पाऊल उचलण्यात येत असल्याचेही या मंत्र्याने सांगितले. हिवाळी अधिवेशनासाठी नवे सरकार सज्ज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष आमच्यासमोर असणार आहे. त्याला तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही या मंत्र्याने पुढे नमूद केले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33WImSZ
via IFTTT