मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दूरसंचार कंपन्यांना भराव्या लागणाऱ्या हजारो कोटींच्या शुल्काबाबत सरकारने दिलासा दिला नाही तर व्यवसाय बंद करू असे मत ज्येष्ठ उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांनी व्यक्त केल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. यानंतर धसतवलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार विक्री केली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ३३४ अंकांनी घसरला आणि ४० हजार ४४५ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९७ अंकांची घसरण झाली आणि तो ११हजार ९२१ अंकांवर स्थिरावला. आजच्या सत्रात येस बँक, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय , इंड्सइंड बँक, एचडीएफसी आदी शेअर घसरणीसह बंद झाले. या पडझडीत कोटक महिंद्रा, टाटा स्टील, रिलायन्स , एशियन पेंट्स, टीसीएस या शेअरच्या किमती वधारलय. कुमार मंगलम बिर्ला यांच्या व्यक्तव्याने व्होडाफोनच्या शेअरला झळ बसली. व्होडाफोनचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला. मुंबई शेअर बाजारात सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. वाचा : नुकताच ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी सुद्धा जाहीर कार्यक्रमात सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. उदयोजकांच्या नाराजीने केंद्राच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.