मुंबई: महाराष्ट्राकडे असलेले केंद्र सरकारचे ४० हजार कोटी परत करण्यासाठी तीन दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते, हा खासदार यांचा दावा फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. 'हे सगळं धादांत खोटं आहे. महाराष्ट्रानं एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवेसना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीला रोखण्यासाठी फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीनं सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो सपशेल अपयशी ठरला. अजित पवारांनी माघार घेतल्यानं अवघ्या ८० तासांत फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं विरोधकांकडून त्यांची 'तीन दिवसांचे मुख्यमंत्री' म्हणून खिल्ली उडवली जात आहे. तीन दिवसांच्या या मुख्यमंत्रिपदाचं रहस्य कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी नुकतंच उघड केलं. 'महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेले केंद्राचे ४० हजार कोटी परत करण्यासाठीच फडणवीस हे तीन दिवसांचे मुख्यमंत्री झाले होते,' असा दावा त्यांनी केला होता. त्यांचं हे वक्तव्य सर्वत्र व्हायरल झालं आहे. भाजपच्या खासदारानंच हा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. फडणवीस यांनी मात्र ही सगळी चर्चा खोडून काढली आहे. 'हेगडे काय म्हणाले मला माहीत नाही. मला मीडियातूनच ही माहिती मिळाली. मात्र, त्यात काहीही तथ्य नाही. पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी शेतकऱ्यांच्या मदतीच्या निर्णयाशिवाय कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुळात बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडून कुठलाही निधी मिळालेला नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक कंपनी सुरू करण्यात आली आहे. त्या प्रकल्पासाठी निधी आलाच तर तो थेट संबंधित कंपनीकडं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. राज्य सरकारकडे केवळ भूसंपादनाची जबाबदारी आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅपवर फॉर्वर्ड होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये,' असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y8tEGQ
via IFTTT