Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उद्धव-पवार भेट; मंत्रिपद ठरले, खातेवाटप अडले



शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापैकी कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे मिळणार हे जवळपास नक्की झाले असून, कोणती खाती वाटून द्यायची याविषयीही जवळपास चर्चा पूर्ण होत आली आहे. मात्र, काही खात्यांबाबत स्पष्टता व्हायची असल्यानेच त्याबाबत आणखी चर्चा करून मगच खातेवाटप जाहीर करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत ठरल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात नेहरू सेंटर येथे शुक्रवारी रात्री जवळपास दीड तास चर्चा झाली. या बैठकीला मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, मंत्री जयंत पाटील, मंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना किती मंत्रिपदे द्यायची याविषयी जवळपास एकमत झाले असले तरी कोणाला कोणती खाती द्यायची याविषयी मात्र अद्याप चर्चा बाकी आहे. महसूल, गृहनिर्माण, गृह आणि नगरविकास या खात्यांच्या अदलाबदलीबाबत यावेळी चर्चा झाली. मात्र, याबाबत ठोस निर्णय न झाल्याने पुन्हा एकदा चर्चा करण्यात येणार असल्याचे कळते. खात्यांबाबत पूर्ण चर्चा न झाल्यास खातेवाटप हिवाळी अधिवेशानंतरही करता येऊ शकते. मात्र, त्याआधी हिवाळी अधिवेशनात सहा मंत्र्यांनाच सर्व कारभार पहावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कशी खाती वाटून दिली जावी, त्यांनी कशाप्रकारे कारभार पहावा, याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे कळते.

रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आगमन होणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही बैठक संपवून पुण्याच्या दिशेने रवाना झाले.