मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा बहुप्रतिक्षित आज पार पडला. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनुभवी मंत्र्यांसह तरुणांनाही संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन महिलांचा समावेश करण्यात आला असून दोन महिला कॅबिनेट मंत्री असणार आहे. काँग्रेसने यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. शिवसेनेच्या दोन महिला आमदार निवडून आल्या आहेत. चोपडा मतदारसंघातून लता सोनावणे आणि भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव निवडून आल्या आहेत. मात्र,
त्यापैकी एकाही महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तासगाव मतदारसंघातून सुमनताई पाटील, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, देवळालीतून सरोज अहिरे विजयी झाल्या. त्यापैकी अदिती तटकरे यांना राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर, काँग्रेसमधून अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, सोलापूर शहर मध्यतून प्रणिती शिंदे, वरोरा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर, तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर, धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड आदी विजयी झाल्या. त्यापैकी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात दोन महिलांचा समावेश होता. पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री होत्या. तर, विद्या ठाकूर या राज्यमंत्री होत्या.
