शेतकर्यांची आर्थिक जीवनवाहिनी म्हणून संबोधल्या जाणार्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेल्या पाच-सात वर्षांपासून दिवाळे निघाले. सर्वसामान्य माणसांच्या ठेवी बँकेकडे गुंतल्या त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक प्रकरणांनी गाजली आणि कुप्रसिद्ध झाली मात्र आता ठाकरे सरकारकडून महात्मा फुले कृषी माफी योजनेअंतर्गत तब्बल बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ५५० कोटी रुपये शेतकर्यांचे कर्ज माफ होणार आहे आणि ही एकरक्कम बँकेच्या खात्यात वसुली वजा जमा होणार आहे. बँकेला उभारी घेण्यासाठी ही मोठी रक्कम येत असून बँक प्रशासनाला बँक उभा करण्यासाठी ही नवी संधी आली आहे.
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दोन लाखांपर्यंतचे शेतकर्यांचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आणि त्यावर तात्काळ अमलबजाणीही सुरू केली. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यापाठोपाठ डबघाईस आलेल्या बँकांनाही या कर्जमाफीचा मोठा सहारा मिळत असल्याचे दिसून येते. बीड जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या पाच-सात वर्षांपासून प्रचंड डबघाईस आहे. या बँक घोटाळा प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल झाले, सक्तीची वसुली झाली आणि बीड जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यात कुप्रसिद्ध ठरली. प्रशासक असलेल्या बँकेवर गेल्या दोन वर्षांपूर्वी लोकशाही मार्गाने निवडणुका होऊन बँक माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात गेली मात्र अध्यक्ष आणि प्रभारी सीईओ देशमुख यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाल्याने पुन्हा जिल्हा बँक चर्चेत आली. मात्र बँकेचे बँकेचे दैव बलवत्तर आणि ठाकरे सरकारच्या कर्जमाफीत बँकेला उभारी घेण्याची संधी मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत २ लाखांपर्यंतचे कर्ज असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. यासाठी तब्बल ५५० कोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकर्यांकडून येणे आहे, ते माफ होऊन ठाकरे सरकार बँकेला ५५० कोटी या कर्जमाफीत देत आहे. त्यामुळे बँक पुन्हा उभी करण्यासाठी हा आकडा मोठा आणि महत्वाचा समजला जातो. मात्र ‘हमाम मे सब नंगे’ आजपर्यंत या बँकेत पहायला मिळाले. आता ५५० कोटी रुपयांचं हे भांडवल समजून शेतकर्यांची आर्थिक जीवन वाहिनी समजल्या जाणार्या जिल्हा बँकेला उभारी द्यावी, अशी अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मध्यवर्ती बँकेत ज्या शेतकर्यांचे पीक कर्ज आहे अशा शेतकर्यांनी आपल्या कर्ज खात्याला आधार लिंक आहे का? नाही याची खातर जमा करावी. ज्या बँक शाखेत आणि सोसायटीत आपले कर्ज खाते थकीत आहे अशा बँकेत जावून कर्जमाफीच्या यादीत आपले नाव घेतले की नाही याची खातर जमाही करावी जेनेकरून या कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार भोंगळ आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कर्जमाफीसाठी जागृक राहावे आणि कर्जमाफीची रक्कम राज्य शासनाकडून प्राप्त झाली की, जिल्हा मध्यवर्ती बँक एखाद्या बँकेत एफीडी करून ठेवणार नाही आणि ती रक्कम आपल्या कर्ज खात्यावर कर्जमाफी दिली की नाही याची खात्री शेतकर्यांनी करावी.
