Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इगोच्या राजकारणात पत्रकाराला बळीचा बकरा बनवू नका!


रेल्वेच्या नियोजनाबाबत 'द हिंदू'पासून अनेक महत्त्वाच्या वर्तमानपत्रात गेले आठ-दहा दिवस सविस्तर छापून येत आहे. (त्याच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.) त्यामुळे रेल्वेच्या संभाव्य नियोजनाबाबत पत्राच्या हवाल्याने राहुलने जे सांगितलं ती बातमी बरोबर होती.

सकाळी 9 वाजता त्यांचं लाईव्ह झालं त्यात त्यांनी कु़ठेही आज ट्रेन सुरु होणार वगैरे म्हटलं नव्हतं. महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर तासाभरात म्हणजे 10 वाजता पंतप्रधानांचे भाषण झालं. लॉकडाऊन वाढलं. त्यानंतर 1045-11.00 ला रेल्वेचं स्पष्टीकरण आलं त्यात कुठेही ते लेटर चुकीचं आहे असं म्हंटलं नाही फक्त तो अंतर्गत पत्रव्यवहार होता लिक झाला वगैरे स्पष्टीकरण आलं. 11-11.30 च्या सुमारास एबीपी माझाने रेल्वे बंद राहतील ही बातमी सुद्धा नीट चालवली आणि पुढे दिवसभर रिपीट सुद्धा केली. अगदी वेबच्या बातमीतही अपडेट केलं.

वांद्र्यात गर्दी जमली चारच्या आसपास. म्हणजे राहुलच्या लाईव्हनंतर तब्बल सात तासांनी, रेल्वे बंद आहेत हे रेल्वे मंत्रालयाने सर्व जगाला सांगितल्याच्या पाच तासानंतर. लॉकडाऊन सुरु असताना आणि सर्वसामान्य माणसाला महत्त्वाच्या कामाला बाहेर पडताना पंचवीस वेळा हटकलं जातं तिथे हजारोच्या संख्येनं गर्दी जमली कशी? त्या गर्दी मागे कोण होतं? फक्त तिथेच गर्दी का जमली? महाराष्ट्रातल्या इतर भागातील लोकांना राहुलची बातमी कळली नाही का? असे अनेक प्रश्न बाजूला ठेवू पण वांद्र्यातील त्या अनागोंदीला सात तास आधीच्या प्लेन बातमीला आणि पत्रकाराला जबाबदार धरणं, बातमीला अफवा म्हणणं यासारखा अतर्क्य प्रकार दुसरा नसेल. बरं त्याबाबत त्याला नोटीस देणं, जाब विचारणं, चौकशी लावणं हेही समजू शकतो पण कोरोना महामारीचा धोका सर्वत्र असताना मुंबईतून रातोरात 450 किलोमीटर दूर उस्मानाबादला टीम पाठवणं पहाटे त्यांना घरातून उठवून योग्य कारण न सांगता योग्य ती कार्यवाही पूर्ण न करता गाडीत घालून मुंबईला घेऊन येणं हे तर्क आणि न्यायसंगत वाटत नाही.

राहुल एबीपी माझाचा विभागीय संपादक आहे, बातमीशी इमान राखणारा, चुकीला चूक; बरोबर ते बरोबर म्हणणारा निर्भीड नि:पक्ष अभ्यासू प्रामाणिक पत्रकार आहे, पत्रकारितेला सतत संशयाच्या चष्म्यातून बघितल्या जाणाऱ्या काळात त्याने कामातून नाव आणि प्रेक्षकांचा विश्वास कमावला आहे.

अगदी गेल्याच आठवड्यात वाधवान कुटुंबाला मिळालेली स्पेशल परवानगी आणि त्यामागील गृह विभागाचा गलथानपणा त्यानेच सातारा प्रतिनिधीच्या मदतीने समोर आणला होता; ती नॅशनल ब्रेकिंग न्यूज बनली होती.

त्याने बातम्या करताना फक्त समाजाच्या भल्याचा विचार केला, समोर कोण आहे याचा विचार केला नाही त्यामुळेच त्याच्या कामावर नाराज असणाऱ्यांची; राग असणाऱ्यांची, इगो दुखावला गेलेल्यांची संख्या कमी नाही. फक्त ते या थराला जातील, राजकारणासाठी, कुणाचा तरी इगो जपण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करुन राहुलसारख्या सच्च्या पत्रकाराला अशा खोट्या केसमध्ये अडकवतील, त्याच्या बदनामीची मोहीम हाती घेतील असं कधीही वाटलं नव्हतं.

दुर्दैवाने सोशल मीडियावर सत्य खूप कमी मात्रेत झिरपतं किंवा तुम्ही ज्या राजकारण्यांचे किंवा पक्षाचे समर्थक आहात त्यांनी सांगितलंय तेवढंच पोहोचतं. पण ते आणि तेवढंच सत्य असतंच असं नाही. त्या जाळ्यात अडकून राहुलवर बेछूट टीका करण्यापूर्वी यामागील राजकारणाचा शांततेत विचार करायला हवा, एकदा शांतपणे सगळा विषय नीट समजून घ्यायला हवा, घटनाक्रम नीट तपासायला हवा.

कारण या सर्व प्रकारात राहुलचं एकट्याचं नुकसान नाही. नुकसान चांगल्या पत्रकारितेचं होणार आहे, समाजाचं होणार आहे, सर्वसामान्य जनतेचं होणार आहे. राहुल लढतोय ती लढाई आपली सर्वांची आहे हे आज ना उद्या आपल्या सर्वांच्या लक्षात येईल असा विश्वास आहे.

#IsupportRahul

संदीप रामदासी