मुंबई: धारावीत कालही करोनाचे २५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या २१४वर गेली आहे. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने धारावीला करोनामुक्त करण्यासाठी विशेष रणनिती तयार केली आहे. मुंबई महापालिकेने धारावीसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या रणनितीनुसार आता धारावीतील रुग्ण असलेले एरिया निश्चित केले जाणार आहेत. त्या ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. या निश्चित केलेल्या विभागांमध्ये टेस्टिंगची संख्या वाढवणं, स्क्रीनिंगचं प्रमाण वाढवणं, कंटेनमेंट झोनवर अधिक लक्ष्य केंद्रीत करणं, सॅनिटायझेशन करणं,
लॉकडाऊनच्या नियमांचं कठोरपणे पालन करणं आणि क्वॉरंटाइन सेंटरमधील खाटांची संख्या वाढवणं आदी गोष्टींचा यात समावेश आहे. केंद्राचं पथक धारावीत येऊन पाहणी करून गेलं. या पार्श्वभूमीवर पालिकेने ही रणनिती तयार केली आहे. धारावीतील मुकुंद नगर, मदिना नगर, मुस्लिम नगर, कल्याणवाडी आणि सोशल नगर या पाच एरियात सर्वाधिक करोना रुग्ण सापडले आहेत. धारावीची लोकसंख्या ८ लाख आहे. त्यापैकी सवा लाख लोक या पाच एरियात राहतात. धारावीतील ७० टक्के रुग्ण याच पाच एरियात आहेत. त्यामुळे हे पाचही विभाग सॅनिटाइज करण्यात येणार आहेत. तसेच या विभागात काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून आता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. या पाचही विभागातील सर्वांचीच टेस्ट होणार आहे.
