मुंबई: गावागावातील म्हणते पारु, लॉकडाऊनमुळे सुटली आहे माझ्या नवऱ्याची दारू!
अशी शीघ्र कविता करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी दारूची दुकाने सुरू करण्याच्या मागणीवर जोरदार टोलेबाजी केली आहे. थोडासा महसूल मिळविण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील दारूची दुकाने अजिबात सुरू करता कामा नये. त्यामुळे कोट्यवधी कुटुंबातील आनंदावर विरजण पडेल, असे आठवले यांनी म्हटले आहे. करोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे.
लॉकडाऊनच्या काळात दारू विक्रीची दुकाने बंद असल्याने अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. गावागावातील म्हणते पारू, लॉकडाऊनमुळे माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारू. त्यामुळे जर थोड्या महसुलासाठी लॉकडाऊनच्या काळात पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तर कोट्यवधी लोकांच्या आनंदावर विरजण पडेल. त्यामुळे दारूची दुकाने लॉकडाऊनच्या काळात बंदच ठेवावीत, अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकारचा महसूल वाढण्यासाठी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांच्या या मागणीस आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. लॉकडाऊनमध्ये कोठेही दारू मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. ज्यांचे दारूचे व्यसन सुटले, अशांच्या कुटुंबात आनंदी वातावरण आहे. आता पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्याचा विचार राज्य शासनाने केला तर तो निर्णय चुकीचा ठरेल, असे रामदास आठवले यांनी संगितले.
