
पुणे: महाराष्ट्र सरकारने नुकतीच परीक्षा पुढे ढकली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. दुसरीकडे राज्यात लॉकडाऊन प्रक्रिया सुरू असताना फक्त परिक्षेबाबत मात्र घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी निषेध नोंदवला आहे. या निषेधार्थ त्यांनी शहरात होर्डिंग लावले आहेत. मुख्यमंत्र्यांना टोपी घालतंय कोण? अशा आशयाच्या या फलकाची शहरात चर्चा आहे. याच होर्डिंग मध्ये 'पवार' फुल युवा नेते असा उल्लेख करत या नेत्यांचा खाजगी क्लास चालकांवर आशीर्वाद असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्यावरचं हा आरोप असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. परीक्षा रद्द आणि क्लास चालू करण्याची मागणी होत असल्याचे देखील यात नमूद करण्यात आले आहे. दिवसभर रंगलेल्या या होर्डिंगच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबत यादव यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, राज्यसरकारचा हा निर्णय मुळात आश्चर्यकारक आहे. या निर्णयाने असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. परीक्षा पुढे ढकली हे सांगत असताना, मुख्यमंत्र्यांनी परीक्षा कधी होणार ? याचे उत्तर मात्र दिले नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपत असल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच राज्यसरकार इतके दिवस झोपले होते का ? ही नियोजित परीक्षा यापूर्वी एकदा पुढे ढकलण्यात आलीच होती, केंद्र बदलून देण्याची अन्यायकारक सोय देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली होती. आयोगाने विद्यार्थ्यांच्या आरोगायला केंद्र बिंदू ठेवून परीक्षा घेण्यासाठी तयारी देखील केली होती. त्यामुळे असंख्य विद्यार्थी परीक्षेसाठी पुणे शहरात दाखल झाले होते, या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक, मानसिक पिळवणूक याचा विचार सरकारने करायला नको का? असा थेट प्रश्न यादव यांनी केला आहे. यादव पुढे म्हणाले, काही राजकीय मातब्बर घरातील युवा नेते एका बाजूला स्पर्धा परीक्षेचे खाजगी क्लास चालू करण्याची मागणी करतात आणि दुसरीकडे परीक्षा पूढे ढकलण्याची. या दोन मागण्यामध्ये असणारा विपर्यास स्पष्ट दिसून येतोय, त्यामुळे या नेत्यांचा या क्लास चालकांवर असणारा वरदहस्त स्पष्ट दिसतो आहे. परीक्षा देतांना आरोग्य धोक्यात येते आणि क्लास चालू केल्याने येत नाही? व्यावरूनच या पाठीमागचा मूळ उद्देश स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांची तळमळ,कष्ट, आर्थिक अडचण, भविष्याची चिंता या सगळ्यात भरडणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठीच हे फलक लावण्यात आले आहेत. आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच आहेत, तर फक्त स्पर्धा परिक्षांवर हा अन्याय का ? राज्यसरकार किमान या जाहीर फलकामुळे तरी जागे होईल, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली. MPSC: Who is wearing a hat to the Chief Minister? Discussion of Manvise hoardings