Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आज विधानसभेत बहुमताची अग्निपरीक्षा १६९ विरुद्ध ० अशी सहजपणे पार केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यासाठी येत्या २२ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार, हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचं सत्तावाटप निश्चित झालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे, विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे तर विधानसभेचं उपाध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. यानुसार उद्धव ठाकरे सरकार बहुमताची अग्निपरीक्षा पास झाल्यानंतर उद्या रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसकडून या पदासाठी नाना पटोले यांनी आपला अर्ज दाखल केला आहे तर त्यांच्याविरुद्ध भाजपने किसन कथोरे यांना उमेदवारी दिली आहे. या अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे व नागपूर येथे होणारं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच २२ डिसेंबरनंतर या पदाबाबद पक्ष निर्णय घेणार आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या तरी भाजपसोबत औटघटकेचा घरोबा करून माघारी परतलेले अजित पवार यांचे नाव या पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे जयंत पाटील यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. सरकारने जिंकला 'विश्वास' उद्धव ठाकरे सरकारने आज बहुमताची अग्निपरीक्षा पास केली. आधी आवाजी मतदान घेण्यात आले व नंतर शिरगणतीही करण्यात आली. भाजपचे सदस्य व समर्थक आमदारांनी मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सभागृहाचे दरवाजे बंद करून सरकारच्या बाजूनं, विरोधात व तटस्थ असलेल्या सदस्यांची गणती करण्यात आली. विश्वास ठरावाच्या बाजूनं १६९ मतं पडली आणि विरोधात शून्य मतं पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकपचे प्रत्येकी एक आणि एमआयएमचे दोन असे एकूण चार सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळं हा ठराव उद्धव ठाकरे सरकारनं १६९ विरुद्ध ० मतांनी जिंकल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34Mr4J6
via IFTTT