मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल महिन्याभरानंतर काँग्रेसनं आपल्या विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचीच या पदावर निवड झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्या नावाची घोषणा केली.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालायनं दिलेल्या निर्णयानंतर मुंबईतील जे. डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यात गटनेते पदासाठी थोरात यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला एकमतानं मंजुरी देण्यात आली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हेही यावेळी उपस्थित होते. राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत. निकालानंतर सर्व प्रमुख पक्षांनी काही दिवसांतच आपल्या गटनेत्याची निवड केली होती. भाजपनं देवेंद्र फडणवीस, शिवसेनेनं एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार यांची गटनेते पदी निवड केली होती. अजित पवार हे भाजपला जाऊन मिळाल्यानंतर त्यांच्या जागी जयंत पाटील यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसनं केली होती. मात्र, काँग्रेसनं अद्याप विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला नव्हता. त्यामुळं काँग्रेसवर टीकाही झाली होती. सत्ता स्थापनेसाठी अटीतटी सुरू असताना व तातडीनं निर्णय घेण्याची गरज असतानाही काँग्रेसमध्ये शांतता होती. सर्वोच्च न्यायालयानं नव्या सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर आज काँग्रेसनं नेता निवडीचे सोपस्कार पार पाडले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35vAicI
via IFTTT