Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पवार, उद्धव यांच्या उपस्थितीत वरळीत 'महा'बैठक सुरू

मुंबई: राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आघाडी दरम्यान सुरू असलेलं बैठका आणि भेटीगाठींचं सत्रं आजही सुरूच आहे. आता वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांची बैठक सुरू असून या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित आहेत. राज्यातील सत्तापेचावर या बैठकीत आजच अंतिम फैसला होणार असल्याने राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन दिवस झालेल्या बैठकीनंतर काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत रात्री उशिरा शरद पवार यांची भेट घेतली होती. काल रात्री ११ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री सव्वा बारा वाजता संपली होती. त्यानंतर आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख यांनी मातोश्री निवासस्थानी ७५ मिनिटं शिवसेना आमदारांशी संवाद साधला होता. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची हॉटेल 'द ललित'मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच दिवसांसाठी हे हॉटेल बुक करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच आमदारांना मुंबई आणि हॉटेलबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज दुपारी वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत असून सत्ता सूत्रावर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. भाजपला रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी गळ आघाडीच्या नेत्यांनी उद्धव यांना घातल्याचंही सांगण्यात येतं. दरम्यान, बैठक संपल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार असून किमान समान कार्यक्रमासह सत्ता सूत्राचीही माहिती मीडियाला देणार आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटून सत्तेचा दावा आजच करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या या बैठकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Oa6egW
via IFTTT