Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राणेंच्या शुभेच्छा व इशाराही!

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. नव्या सरकारने राज्याच्या हिताचे काम केल्यास या सरकारला माझं सहकार्यच असेल, असे नमूद करत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी शिवसेनेची पर्यायाने बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी आणि मराठी माणसांच्या हिताला अग्रक्रम देणारी असून त्या विचारधारेला मूठमाती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे, असे टीकास्त्रही राणे यांनी सोडले आहे. नारायण राणे आणि शिवसेनेतील वैर जगजाहीर आहे. त्यातून दोन्ही बाजूने सातत्याने हल्ले-प्रतिहल्ले होत असतात. आता गेल्या महिनाभरातील सत्तासंघर्ष मागे पडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असताना राणे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा देताना भविष्यातील संघर्षाचेही संकेत दिले आहेत. मी राज्याचा माजी मुख्यमंत्री असल्याने राजशिष्टाचारानुसार खरंतर मला शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करायला हवं होतं. मात्र तीनपैकी एकाही पक्षाने तसं केलं नाही. असं असलं तरी मी त्याबाबत नाराज नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. नव्याने स्थापन झालेली आघाडी आणि राज्यात सत्तेत आलेलं नवं सरकार याबद्दल विचारलं असता संतुलित भूमिका राणे यांनी मांडली. मी मूळचा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी स्वत:हून कधीच सूडाचं राजकारण केलं नाही. त्यामुळे माझ्याशी कुणी सूडाचे राजकारण करू नये इतकीच माझी अपेक्षा आहे, असे राणे यांनी नमूद केले. नव्या सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे काम केल्यास माझं या सरकारला सहकार्य असेल मात्र सूडबुद्धी आणि आकसाने सरकार वागल्यास मी माझ्या स्टाइलने या सरकारवर तुटून पडेन, असा इशारा राणे यांनी दिला. बाळासाहेबत असते तर त्यांनी या अशाप्रकारच्या आघाडीला कधीही मान्यता दिली नसती. उद्धव यांनी केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे. आता आघाडीचे नेते जे बोलतील ते उद्धव ठाकरेंना मान्य करावं लागेल, असेही राणे पुढे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे स्थिर राहील, असे आताच म्हणणे घाईचे ठरेल. काँग्रेसमध्ये दुफळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार अस्वस्थ व नाराज आहेत, या साऱ्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात, असेही राणेंनी पुढे नमूद केले. आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर राणे यांनी टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे विकासाला ब्रेक लावण्यासारखंच आहे, असे राणे म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34yd45T
via IFTTT