Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा; तसं ठरलंय: अजितदादा

मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंड फसल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा करत हे पद राष्ट्रवादीलाच मिळणार असा दावा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव यांच्यासोबत गुरुवारी शिवतीर्थावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचवेळी उपमुख्यमंत्रिपदाबाबत मात्र सस्पेन्स ठेवण्यात आला. विधानसभेत उद्धव सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर ३ किंवा ४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार असून त्यावेळी नव्या सरकारला उपमुख्यमंत्री मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. हे पद राष्ट्रवादीकडे जाणार व त्यासाठी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच आहे, असे सांगितले जात आहे. असे असतानाच हे पद काँग्रेसला सोडण्यात येईल व राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल, असे वृत्त खात्रीशीर सूत्रांच्या हवाल्याने आज पुढे आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. महाविकास आघाडीचं सरकार विराजमान झालं असलं तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्याप महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरून एकमत झालेलं नाही, असेच त्यावरून स्पष्ट होत आहे. अजित पवार यांना याबाबत माध्यमांनी विचारलं असता त्यांनी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असे सांगून हे पद राष्ट्रवादी सोडणार नाही, असे ठासून सांगितले आहे. महाविकास आघाडीने पद आणि जबाबदाऱ्या आधीच निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल, विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे असेल असे ठरलेले आहे, असे नमूद करतानाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा अजित पवार यांनी केले. वरिष्ठांनी जे ठरवलं होतं त्यानुसार मुख्यमंत्र्यांसोबत अन्य ६ मंत्र्यांनी कालच शपथ घेतली आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे, असेही अजितदादा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे अजित पवार यांनी स्वागत केले. आरे कारशेडवर शिवसेनेच्या भूमिकेला सुप्रिया सुळे यांचा आधीपासूनच पाठिंबा होता. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहेच, असे अजितदादा म्हणाले.



from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2pYZBVw
via IFTTT