मुंबई: आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार आहे. शिवसेनेचा एक गट भाजपला येऊन मिळणार आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही भाजपलाच पाठिंबा देतील, असा गौप्यस्फोट भाजप समर्थक अपक्ष आमदार, यांनी केला आहे. राणा यांनी केलेल्या या दाव्यावर तर्क-वितर्क वर्तवण्यात येत आहेत. रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार आहेत. ते विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. २५ दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात नवं सरकार स्थापन करतील, असं भाकीत केलं होतं. त्यांचं हे भाकीत तंतोतंत खरं ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर तर्क-वितर्क वर्तवण्यात येत आहे. 'आमच्याकडे बहुमताचा आकडा असून एकूण १७५ आमदार आमच्याकडे आहेत. आम्ही यादी तयार केली आहे. त्यातून हा आकडा आला आहे', असं सांगतानाच 'येणाऱ्या काळात शिवसेनेत मोठा भूकंप होईल. मोठी फूट पडेल. शिवसेनेचा एक गट आमच्यासोबत येईल. त्यामुळे आमचं संख्याबळ आपोआप वाढेल. पण कमी होणार नाही', असं राणा म्हणाले. आज अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला. उद्या शरद पवार सुद्धा आम्हालाच पाठिंबा देतील, असं भाकीत करतानाच २५ दिवसांपूर्वीच मी भाजप-राष्ट्रवादीचं सरकार येणार असल्याचं सांगितलं होतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37zY6y0
via IFTTT