डॉ. श्रीराम लागू यांचे निधन :
- ‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त विनवणी करीत रसिकांचे हृदय आपल्या अभिनयातून हेलावून टाकणारा रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेला.
- ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशा रंगभूमी तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
- 1951 पासून सुरू झालेल्या नाट्य व चित्रपट कारकिर्दीमध्ये जवळजवळ पन्नास वर्षात डॉ. लागू यांना अनेक मानसन्मान मिळाले.
- भारत सरकारतर्फे 1974 साली ‘पद्मश्री’, महाराष्ट्र शासनातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार, 2000 साली ‘पुण्यभूषण’, त्यामध्ये ‘संगीत नाटक अकादमी’ आदी पुरस्कारांचा समावेश आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांना ‘सुगंधी कट्टा’. ‘सायना’ व ‘भिंगरी’ या चित्रपटांतील अभिनयासाठी ‘फिल्मफेअर’ पारितोषिकांनी गौरवले होते. ‘घरोंदा’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
मेरठचे नाव पंडित नथुराम गोडसे नगर करणार :
- उत्तर प्रदेशात आता पुन्हा एकदा काही जिल्ह्यांची नावं बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये मेरठ जिल्ह्याचे नाव बदलून पंडित नथुराम गोडसे नगर, गाझियाबादचे नाव महंत दिग्विजय नगर आणि हापूड जिल्ह्याचे नाव महंत अवैद्यनाथ नगर असे नामांतर करण्याचे अनेक प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. या प्रस्तावांवर योगी सरकारने संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तातडीने उत्तर मागवले आहे.
- तर उत्तर प्रदेशच्या महसूल विभागामार्फत याबाबत तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून यावर तातडीने उत्तर मागवले आहे. या पत्रानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या एकिकृत तक्रार निवारण प्रणालीमध्ये (IGRS) हापूडचे नाव महंत अवैद्यनाथ नगर आणि गाजियाबादचे नाव महंत दिग्विजय नगर असे करण्याबाबत म्हटले आहे.
- दरम्यान, हापूड जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु महंत अवैद्यनाथ यांच्या नावावरुन जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. मात्र, या पत्रात मुजफ्फरनगरचे नाव कोणाच्या नावाने बदलण्यात यावे याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
मराठमोळ्या स्मृतीला ICC कडून मिळाला बहुमान :
- टीम इंडियाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधाना हिला ICC च्या 2019 या वर्षातील एकदिवसीय आणि टी 20 संघात स्थान मिळाले आहे. वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून ICC वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते.
- त्यातील एकदिवसीय आणि टी 20 अशा दोनही संघात भारताच्या स्मृती मंधानाचा समावेश करण्यात आला आहे.
- स्मृतीने वर्षभरात 51 एकदिवसीय सामने तर 66 टी 20 सामने खेळले. त्यात तिने अनुक्रमे 2 हजार 25 आणि 1 हजार 451 धावा केल्या. तिच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ICC कडून तिला हा बहुमान मिळाला आहे.
- तसेच स्मृतीव्यतिरिक्त शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचाही वर्षाच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी टी 20 संघात स्थान मिळवले आहे. ICC ने मंगळवारी दोनही संघ जाहीर केले.
सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी :
- ओदिशाच्या चांदीपूर तळावर मंगळवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण दलातील सूत्रांनी ही माहिती दिली. चांदीपूरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्पलेक्स 3 मध्ये मोबाइल लाँचरवरुन जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्रह्मोसच्या आवृत्तीची चाचणी घेण्यात आली.
- तर या चाचणीने सर्व निकष पूर्ण केले आहेत असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) सांगण्यात आले.
- ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. युद्धनौका, पाणबुडी, मोबाइल लाँचर आणि फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते.
- ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो.
- तसेच सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.
- ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
दिनविशेष:
- 18 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर ‘भिखारी ठाकूर‘ यांचा जन्म 18 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
- एफ.एम. रेडिओचे संशोधक ‘ई.एच. आर्मस्ट्रॉंग‘ यांचा जन्म 18 डिसेंबर 1890 मध्ये झाला होता.
- सव्यसाची मुखर्जी यांनी सन 1989 मध्ये भारताचे 20वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
- सन 2016 मध्ये भारतीय ज्युनियर हॉकी टिमने बेल्झियमला हरवून ज्युनियर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.
