मुंबई: अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची दाट शक्यता असून पवन आणि अम्फन अशी या वादळांची नाव आहेत. येत्या २४ तासांत ही चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक भागात उद्या पावसाचा अंदाज 'स्कायमेट'ने वर्तवला आहे. क्यार आणि महा चक्रीवादळांनंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते. अरबी समुद्रात या आधी चार तर बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळांची या वर्षी निर्मिती झाली. त्यातच अरबी समुद्रात पवन व अम्फन आणखी दोन चक्रीवादळे निर्माण होत आहेत. पवन हे नाव श्रीलंकेच्या सूचनेवरून देण्यात आले आहे तर अम्फन हे नाव थायलंडच्या सूचनेनुसार देण्यात आले आहे. वादळांचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना सतर्क करण्यात आलं आहे. गुरुवारपर्यंत खोल समुद्रात न जाण्याची सूचना मच्छिमारांना देण्यात आली आहे. वादळांचा किती धोका? पवन आणि अम्फन ही चक्रीवादळं एकाचवेळी येण्याची भीती आहे. सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. प्रथम उत्तर पश्चिम दिशेला व नंतर पश्चिम दिशेने हे वादळ पुढे सरकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अम्फन वादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात घोंगावत असून या वादळाचा परिणाम म्हणून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरातच्या विविध भागांत येत्या २४ तासांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील समुद्र या काळा खवळलेला राहणार आहे. वादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका असेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. वादळांची संख्या जाणार ९ वर यंदाच्या वर्षात अरबी समुद्रात चार तर बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळांची निर्मिती झाली. त्यात आणखी दोन वाळळांची भर पडल्यास वादळांची संख्या ९ वर पोहचणार आहे. १९७६ मध्ये भारताला सर्वाधिक १० वादळांचा तडाखा बसला होता.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34PJlFE
via IFTTT