नवी दिल्ली: महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडींनंतर झालेल्या सत्तांतरावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्यानंतर आता त्यांची कन्या व खासदार यांनीही 'मन की बात' केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ऑफर विनम्रपणे नाकारण्याचा शरद पवार यांचा निर्णय योग्यच आहे, असे नमूद करताना 'शरद पवार हे केवळ माझे वडील नाहीत तर ते माझे बॉसही आहेत आणि बॉस कधीच चूकत नाही...बॉस इज ऑलवेज राइट...अशी फटकेबाजी सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाचेही कौतुक केले. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असतानाच शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत पवार यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले असता पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. पंतप्रधानांनी एकत्र काम करण्याचा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला. केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली मात्र मोदींचा हा प्रस्ताव मी नम्रपणे नाकारला. आपले वैयक्तिक संबंध चांगेल आहेत आणि चांगलेच राहतील. मात्र आपल्याला एकत्र काम करणे शक्य नाही, असे मी पंतप्रधानांना सांगितल्याचा दावा पवारांनी या मुलाखतीत केला आहे. यासह अनेक मुद्द्यांवर सुप्रिया यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत परखड मते मांडली. 'पंतप्रधानांनी मनाचा मोठेपणा दाखवून एकत्र काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली असली तरी माझ्या वडिलांनी तितक्याच विनम्रपणे अगदी सन्मानाने पंतप्रधानांना नकार दिला. अर्थात मी या बैठकीला हजर नव्हते. ही दोन ज्येष्ठ नेत्यांची बैठक होती. त्यामुळे मी त्यावर अधिक बोलणं उचित ठरणार नाही', असे सुप्रिया म्हणाल्या. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणूक प्रचारादरम्यान शरद पवार यांच्यावर थेट शब्दांत टीका केली होती. शरद पवार यांना पाकिस्तानप्रेमी म्हणण्यात आलं होतं. त्याबाबत विचारले असता महाराष्ट्रात आमची भाजपशी अगदी टोकाची लढाई होती. निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षांत बरीच कटुता आली. टीका करताना अत्यंत खालची पातळी गाठण्यात आली. अगदी वैयक्तिक टीका करण्यात आली. हे चुकीचे आहे. अशाने नव्या पिढीपुढे आपण काय आदर्श ठेवणार आहोत, असा सवाल सुप्रिया यांनी केला. आई-बाबांबदद्ल काय म्हणाल्या सुप्रिया... महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाकडे मागे वळून पाहते तेव्हा माझ्या डोळ्यापुढे राजकीय उलथापालथीचे ८-९ दिवस उभे राहतात. अनेक कठीण प्रसंग या काळात उभे ठाकले मात्र माझ्या आई-वडिलांनी कधीच त्रागा केला नाही. संयम सोडला नाही. ते कधीही गोंधळलेले दिसले नाहीत. दोघेही अत्यंत शांत होते. संकटाला सामोरं जात असताना भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक असतं आणि तरच तुम्ही त्यातून मार्ग काढू शकता, हे मला या काळात दिसलं, अशा भावनाही सुप्रिया यांनी व्यक्त केल्या. शरद पवार यांना भारतीय राजकारणातील नवे चाणक्य असं म्हटलं जात आहे, याकडे लक्ष वेधले असता हे केवळ लोकांचं प्रेम आणि विश्वास आहे. राजकारणात केवळ चाणक्यनिती असून चालत नाही. लोकांचं आयुष्य समृद्ध करणं हा आपला उद्देश असला पाहिजे आणि पवार यांनी नेहमीच त्याला प्राधान्य दिलं, असे सुप्रिया म्हणाल्या. ते एक वाईट स्वप्न होते अजित पवार उपमुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे उत्तर सुप्रिया यांनी दिले. अजित पवार चुकले असे वाटते का, या प्रश्नावरही अगदी स्पष्ट उत्तर सुप्रिया यांनी दिलं. त्यांनी केलेली चूक म्हणा वा वेगळा विचार म्हणा. मी याकडे एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे पाहते. हे वाईट स्वप्न आता मागे पडले आहे. आता सगळे काही सुरळीत झाले आहे, असे सुप्रिया म्हणाल्या. उद्धव यांच्या नेतृत्वाचे कौतुक उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासन हाकण्याचा अनुभव नाही. तरीही मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर तिन्ही पक्षांचे एकमत कसे झाले, याबाबत विचारले असता उद्धव यांचे नेतृत्व कसे उजवे आहे, हे सुप्रिया यांनी सांगितले. उद्धव यांनी शिवसेना पक्ष चांगल्याप्रकारे हाताळला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना फुटेल, पक्षाची छकले पडतील, असे बोलले जात होते मात्र उद्धव यांनी पक्ष सावरला, पुढे नेला आणि आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेत. विरोधात असतानाही मी नेहमीच त्यांच्या नेतृत्वाला दाद देत आली आहे. त्यांच्या विचारात स्पष्टता आहे. होय तर होय आणि नाही तर नाहीच, अशी त्यांची भूमिका असते. ते मला कधीही गोंधळलेले दिसले नाहीत, अशा शब्दांत सुप्रिया यांनी उद्धव यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33HnpLl
via IFTTT