SBI एटीएममधून पैसे काढण्यासाठी एक जानेवारीपासून नवीन नियम :
- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. बँक ‘वन-टाइम पासवर्ड'(OTP) आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली अंमलात आणणार आहे. उद्यापासून अर्थात 1 जानेवारी 2020 पासून ही नवीन प्रणाली अंमलात येईल.
- तर एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे.
- तसेच ओटीपी प्रणालीअंतर्गत रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला बँकेकडे असणाऱ्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांना लागू असेल. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिलीये. यामुळे अवैध व्यवहार रोखू शकतील असे बँकेचे म्हणणे आहे.
शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात केरळ अव्वल :
- निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात 2019 मध्ये पुन्हा केरळच पहिल्या क्रमांकावर आले असून या शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ती योजनेत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरी तपासली जात असते.
- तर एसडीजी इंडिया निर्देशांक 2019 अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यात उत्तर प्रदेश, ओदिशा, सिक्कीम या राज्यांनी बरीच प्रगती केल्याचे दिसून आले.
- तसेच गुजरातमध्ये 2018 च्या क्रमवारी तुलनेत काही प्रगती झाली नाही. केरळने पहिला क्रमांक कायम राखला असून 70 गुण प्राप्त केले. चंडीगड केंद्रशासित प्रदेशात प्रथम क्रमांकावर असून त्याला 70 गुण मिळाले.
- हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला. बिहार, झारखंड, अरुणाचल यांची कामगिरी खराब झाली आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा अहवाल जारी करताना सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 पर्यंत साध्य करताना त्यात भारताची मोठी भूमिका असणार आहे.
आधार आणि पॅन लिंक करण्यास 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ :
- ज्यांनी अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे.
- तर सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या संपणार होती. मात्र आधार-पॅन लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. आत्तापर्यंत मुदतवाढ देण्याची ही आठवी वेळ आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एक निर्णय दिला होता. ज्यानुसार आधार कार्ड आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड हवं असल्यास बंधनकारक आहे. 1 जुलै 2017 पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.
देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी :
- भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता 5Gच्या चाचण्या घेणार आहेत.
- तर यापूर्वी 4G इंटरनेट सुविधेमुळे भारतातल्या इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. यामुळे लोकांच्या हातातील जुन्या आणि मर्यादित सुविधा उपलब्ध असणारे मोबाईल फोन जाऊन त्याची जागा स्मार्टफोन्सनी घेतली.
- यानंतर आता भारत इंटरनेटच्या दुनियेत आणखी मोठ्या बदलावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे.
- सरकार टेलिकॉम क्षेत्रातील सर्व कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटणार आहे. त्यासाठी आम्ही 5G तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. यापुढे 5Gचं आता भविष्य आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणार आहोत. सर्व टेलिकॉम कंपन्या या तंत्रज्ञानाच्या चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.
नौदलात बनवणार सहा अण्वस्त्र पाणबुडया :
- पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदलाची 24 पाणबुडया बांधणीची योजना आहे.
- तर यात सहा अण्विक पाणबुडयांचा समावेश असेल. नौदलाने संसदीय समितीला ही माहिती दिली. सागरी क्षेत्रात पाकिस्तान आणि चीनचे आव्हान वाढत चालले आहे. नौदलाच्या ताफ्यात सध्या 15 पाणबुडया आणि दोन अण्विक पाणबुडया आहेत. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र या दोन अण्विक पाणबुडया सेवेमध्ये आहेत.
- तसेच अरिहंत स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे तर, चक्र रशियाकडून भाडयावर घेतली आहे. बहुतांश पारंपारिक पाणबुडया 25 वर्ष जुन्या आहेत.
- 13 पारंपारिक पाणबुडया 17 ते 31 वयोगटातील आहेत. प्रोजेक्ट 75 अंतर्गत सहा नवीन पाणबु़डया बांधण्याच्या योजनेवर नौदल काम करत आहे. हिंद महासागर हे भारतीय नौदलाचे कार्यक्षेत्र असून मागच्या काही वर्षात या भागात चिनी नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. भारतीय नौदलाने आधुनिकीकरणावर भर दिला आहे. अनेक नव्या युद्ध नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.
कसोटी क्रमवारीत कोहली अव्वल स्थानी कायम :
- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वर्षअखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान कायम राखले. मात्र भारताचा कसोटी विशेषज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजाराची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
- कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी स्पर्धेतही अव्वल स्थानी आहे.
- कोहलीचे 928 गुण असून त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (911 गुण), न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (822 गुण), ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबूशेन चौथ्या स्थानावर आहेत.
- मात्र पाचव्या स्थानावरील पुजाराचे 791 गुण आहेत. भारताच्या अजिंक्य रहाणेलाही 759 गुणांसह सातवे स्थान मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 95 धावा करून दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या क्विंटन डी कॉकने 10वे स्थान मिळवले आहे.
- तर गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमरा 794 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (772 गुण) नवव्या आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (771 गुण) 10व्या स्थानावर आहेत.
दिनविशेष:
- 31 डिसेंबर सन 1600 मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
- आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म 31 डिसेंबर 1871 रोजी झाला होता.
- सन 1879 मध्ये थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले होते.
- युनायटेड किंग्डम सन 1985 मध्ये युनेस्कोचे सदस्य बनले.
- 31 डिसेंबर 1999 मध्ये पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
