मुंबई: विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश यांनी दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपण कोणत्याही विकास कामाच्या विरोधात नसून विकास कामांना स्थगिती दिली नाही. मेट्रोचे काम सुरू असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लवकरच खाते वाटप नवं सरकार आल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन संपले आहे. विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्ष निवड, विरोधी पक्षनेता निवड आदी सोपस्कार पार पडले आहेत. त्यामुळे आता सरकार अधिक वेगाने काम करणार असल्याची माहिती उद्धव यांनी दिली. आगामी एक-दोन दिवसात खाते वाटप करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या मंत्रिमंडळातील आम्ही सातही मंत्री एकत्र काम करत असून निर्णय त्वरीत घेतले जात असल्याची माहिती उद्धव यांनी दिली. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. आरेतील एक पानही तोडणार नसल्याचे त्यांनी सांगत कारशेडबाबत पर्यायांचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आरेमध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी ४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या अंधारात झाडे कापण्यात आली होती. त्यावेळी तातडीने अनेक पर्यावरणप्रेमींनी व स्थानिक आदिवासींनी वृक्षतोड थांबवण्याचे प्रयत्न केले. पहाटेपर्यंत मेट्रो कारशेड विरोधी आंदोलन सुरू होते. त्यावेळी सरकारी कामात अडथळा, बेकायदा जमाव जमविणे यांसारख्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात २९ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या आंदोलकांची जामिनावर सुटका करण्यात आली. '
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OZQTz2
via IFTTT