पंढरपूर : तुळशी विवाहानंतर सगळीकडे लग्नसराई सुरु झाली असताना काही शेतकरी कुटुंबातील खास विवाहसोहळे लक्षवेधी ठरु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने हौसेखातर आपल्या मुलीची सासरी पाठवणी थेट हेलिकॉप्टरमधुन केली होती. आता करमाळ्यातील शेतकऱ्यानेही आपल्या लाडक्या लेकीच्या पाठवणीसाठी हेलिकॉप्टर आणुन स्वप्नपुर्ती केली.
हौसेला मोल नसतं' असं म्हणतात. याचीच प्रचिती करमाळ्यातील ग्रामस्थांना आली. करमाळ्यातील कंदरमधील शिवाजी पाटील यांची कन्या स्नेहल हिचा विवाह इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमधील कांतीलाल जामदार यांचे पुत्र अक्षय याच्याशी झाला. कंदरमधील शिवाजी पाटील हे शेतकरी वडिलोपार्जित शेतीचच काम करतात. मुलीचं लग्न ठरल्यानंतर स्वतःच्या मुलीचा विवाह आठवणीत रहावा असा करण्याची त्यांची इच्छा होती.
