बीड: अंबेजोगाई शहरात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. क्रीडा शिक्षकानेच नववीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात नववीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शाळेच्याच क्रीडा शिक्षक नराधमाने अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. शाम दिगंबर वरकड (वय-43) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुरनं.545, पोक्सो कायद्याचे कलम 4,6,8,12 आणि भादंवि 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा शिक्षकाने पीडितेला क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी दिवाळीपूर्वी जालना येथे नेले होते. क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर परत आल्यानंतर त्या मुलीला अंबाजोगाई येथील शासकीय क्रीडा संकुल येथे 17 ऑक्टोबर 2019 रोजी कारमध्ये अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या शिक्षकाने मुलीला ही घटना कोणाला सांगू नको, असे धमकावले होते. यानंतर मुलगी शाळेमध्ये भयभीत राहत होती. ही बाब महिला शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन सविस्तर विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र शिक्षकाकडूनच अशी घटना घडल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाशिममध्ये एका पीडित तरुणी न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसली आहे. या पीडित तरुणीने लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण करून लग्नास नकार दिल्याचा आरोप केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड या गावातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, तरुणाने लग्नास नकार दिल्यानं तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पण, न्याय न मिळाल्याने या तरुणीने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपल्या न्यायासाठी भर थंडीत उपोषणाला बसलेली आहे.
पीडित तरुणीने ऑगस्ट महिन्यात रिसोड येथील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये वीची उर्फ धीरज अग्रवाल यांच्याविरुद्ध कलम 376 ,506 या प्रकारच्या कलमे दाखल केल्या. मात्र, त्याचा भाऊ हा येथील नगरसेवक असल्या कारणाने पोलिसांनी दबावाखाली त्यांना अटक केली नाही, असा आरोप पीडित युवतीने केला आहे.
आरोपी हा गावात फिरतो पण पोलीस त्याला अटक करत नाही. त्यामुळे पीडित तरुणीला न्याय न मिळाल्यानं तिने थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपल्याला न्याय मिळण्यासाठी उपोषणाचा मार्ग निवडला. लग्नाच्या आणाभाका घेऊन प्रेम करणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने राहत्या घरात पंख्याला रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंबईजवळील भिवंडीतील भाग्यनगर येथे मंगळवारी घडली.
स्वाती प्रल्हाद वेमुला (21) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. तिचे बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण झाल्यानं ती ठाणे येथील आयडीएफसी बँकेत गेल्या सहा महिन्यांपासून नोकरी करीत होती. तिच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने ती मोठ्या बहिणीच्या घरी राहत होती. दरम्यान, तिचे पद्मानगर येथील पॅथालॉजीत काम करणाऱ्या साई नावाच्या तरुणासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेम संबंध होते. त्याने लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपूर्वी स्वाती हिने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे स्वाती अस्वस्थ होती. प्रियकराने दिलेला धोका असह्य झाल्याने तिने मेहुणा आणि बहीण कामावर तसंच बहिणीची मुले शाळेत गेल्याने ती एकटीच घरात असताना तिने छताच्या पंख्याला रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्येचा सखोल तपास भिवंडी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
