मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ‘जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारताच सचिवांशी चर्चा केली. पुढील सूचना मिळेपर्यंत कारशेडचं कोणतंही काम होणार नाही, अशा सूचना त्यांनी केल्या. आरेत आता झाडाचं पानही तोडलं जाणार नाही, मुंबईकरांसाठी मेट्रोचं काम सुरूच राहिल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. मोठ्या विरोधानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय रद्द केला नव्हता. रातोरात आरेमधील अडीच हजारपेक्षा जास्त झाडे कापण्यात आल्यानंतर कारशेडचं काम सुरू करण्यात आलं. या मेट्रो मार्गाचं काम प्रगतीपथावर असलं तरी कारशेडशिवाय हा प्रकल्प अपूर्णच असणार आहे. त्यामुळे कारशेडचं नेमकं काय होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. ‘मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच’, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आशिष शेलारांचीही टीका राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजप नेते आक्रमक झाल्याचं दिसत आहे. भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनीही या निर्णयावर टीका केली. "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार! ७० टक्के काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे,’ असं ट्वीट शेलारांनी केलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ov5m6Y
via IFTTT