मुंबई : राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपने सत्ता बनवली नाही. त्यांनी राज्यपालांना जाऊन सांगितले की शिवसेना आमच्यासोबत येत नाही. पण त्यांनी जे आमच्यासोबत ठरवलं होतं ते देण्यास भाजप तयार नाही. त्यांनी विरोधात बसणे पसंत केले पण आम्हांला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद जे ठरले होते ते केले नाही. महाराष्ट्राच्या जनादेश त्यांनी धुडवला आहे, त्यामुळे सरकार स्थापन करून न शकल्याचे खापर भाजपने शिवसेनेवर फोडू नये, भाजपचं निवेदन दुःखद आणि खेदजनक असल्याचे मत संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
भाजपने आपला अहंकार जपला आणि जनादेशाचा अपमान केला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणे हा त्यांचा अहंकार आहे. त्यामुळे त्यांनी राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली नाही या दोष भाजपने शिवसेनेला देऊ नाही. राज्यात स्थीर सरकार न देण्याचा संपूर्ण जबाबदारी ही भाजपची होती, त्याचा दोष शिवसेनेला देऊ नये असेही राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यपालांनी दिला कमी वेळ...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी ७२ तासांचा वेळ दिला होता. पण शिवसेनला २४ तासांचा वेळ दिला आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, जो काही वेळ दिला आहे, त्यात आम्ही आवश्यक असलेला बहुमताचा आकडा राज्यपालांना सादर करू असेही राऊत यांनी सांगितले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना ७२ तासांचा वेळ दिला. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा कमी आमदार आहेत. तर जुळाजुळव करण्यासाठी जरा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे आम्हांला जास्त वेळ देणे गरजेचे होते. पण जे काही असेल तो राज्यपालांना अधिकार आहे. आम्ही राज्यपालांचा आदर करतो. ते अनुभवी आणि जाणार आहेत. त्यांचा निर्णयाचाही आम्ही आदर करतो, असेही राऊत यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही आवाहन
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी आता कसोटीचा क्षण आहे. त्यांनी आता निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी जे बोलले त्यांनी ते करावे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका असल्यास त्यांनी आपला शब्द पूर्ण करावा असेही राऊत यांनी सांगितले.
समान कार्यक्रमावर काम करणार
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना भविष्यात सरकार स्थापन केल्यास किमान समान कार्यक्रमावर काम करणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस काही महाराष्ट्र विरोधी नाही. बेळगाव सीमा प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेते आणि शिवसेनेत एकमत आहे. त्यामुळे अशाच एकमतांच्या भूमिकेवर आम्ही एकत्र येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
