मुंबई: राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या प्रकल्पांचा आज आढावा घेण्यात आला आहे. विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही. हे प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून एकही प्रकल्प बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत राज्यातील सर्व पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सुमारे चार तास ही बैठक चालली. त्यामुळे या बैठकीत मागच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी दिवसभर चर्चा होती. मात्र बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मीडियाशी संवाद साधून ही चर्चा फेटाळून लावली. सध्या राज्यात कोणते पायाभूत प्रकल्प सुरू आहे. त्यावर किती आर्थिक बोजा येऊ शकतो याचा आढावा घेण्यात आला. यावेळी हे प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेले प्रकल्प बंद होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच खात्यातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रत्येक पूर्ण करण्यावर आमचा भर असणार आहे. उलट त्यात आणखी कामे सामावून घेतली जाईल, असं सांगतानाच आरे कारशेड व्यतिरिक्त कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. भीमा-कोरेगावच्या 'त्या' आदेशाची अंमलबजावणी होणार यावेळी त्यांना भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मागच्या सरकारनेच भीमा-कोरेगाव प्रकरणातील किरकोळ स्वरुपातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही, हे पाहण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज झालेल्या बैठकीला समृद्धी महामार्गाचे वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) म्हटले आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे या सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्री सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला असून विविध विभागांची माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील प्रकल्पांपासून ते शेतकऱ्यांच्या योजना आणि राज्याच्या आर्थिक स्थितीची माहितीही त्यांनी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात राज्याच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्याने आणि हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने उद्धव ठाकरे संपूर्ण माहिती घेत असल्याचं बोललं जात आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PlTBPB
via IFTTT