मुंबई: 'पालघरच्या घटनेनंतर एका विशिष्ट विचारांचे तसेच संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलू आणि लिहू लागले आहेत. त्यांचा हिंदुत्ववाद उफाळून आला आहे. पण त्यांचं दु:ख साधू मारले गेले हे नसून साधू मारल्यावर पेटवापेटवीचे प्रयत्न अपयशी ठरले हे आहे,' असा टोला शिवसेनेनं विरोधकांना हाणला आहे. 'जिथं घटना घडली ती ग्रामपंचायत गेली दहा वर्षे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे.
त्यामुळं मारहाण करणार्यांचा रंग कोणता, हे सांगायला नको,' असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर थेट आरोपच केला आहे. पालघरमधील झुंडबळीच्या घटनेनंतर राज्यात राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंतचे भाजप नेते या निमित्तानं ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहेत. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून भाजपच्या या टीकेचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे. 'साधूंच्या हत्येनंतर सोशल मीडियात धार्मिक भेदाभेदीचे विष पेरूनही महाराष्ट्रात धार्मिक उन्माद उसळला नाही यामुळं अनेकांना वैफल्य आले आहे,
असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. 'पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येने महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला हे खरे. असा हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना?,' अशी शंकाही अग्रलेखातून उपस्थित करण्यात आली आहे.
जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी..
